मोदी सरकारने ११ वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सीमा सुरक्षित करून अर्थव्यवस्था मजबूत केली

 मोदी सरकारने ११ वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सीमा सुरक्षित करून अर्थव्यवस्था मजबूत केली

मुंबई दि १६– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकसित भारताच्या अमृतकाळामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नवी यात्रा सुरु केली आहे. मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये जनकल्याण, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठीच्या योजना तसेच देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा हेतू आहे. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने देशाच्या सीमेसह, अर्थव्यवस्था मजबूत केली. तसेच तंत्रज्ञानाला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले, असे गौरवोद्गार भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत काढले.

या पत्रकार परिषदेला आ. योगेश सागर, माजी आ. भाई गिरकर, जिल्हा अध्यक्ष बाळा तावडे, माजी जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना आ. दरेकर म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ करून भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे, हवाई तळ उध्वस्त केला. हिंसाचाराला, दहशतवादाला घरात घुसून उत्तर दिले जाईल, हेच मोदी सरकारने दाखवून दिले आहे. पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की, दहशतवाद पाणी आणि व्यापार हे एकत्र राहू शकत नाही. रक्त आणि पाणी एकावेळी वाहू शकत नाही. भारतीय भूमीवर केलेला कोणताही हल्ला युद्ध मानून त्याला याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा संदेश मोदींनी संपूर्ण जगाला दिला आहे.

क्षेपणास्त्र रक्षण करणारी एस-४०० प्रणाली तसेच ब्रम्होस, आकाश क्षेपणास्त्र, आयएनएस विक्रांत, तेजस आणि प्रचंड अटॅक हेलिकॉप्टर सारख्या बनवलेल्या उत्पादनांनी भारत हा संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर झाल्याचे जगाला दाखवून दिले आहे. आता भारत शस्त्रास्त्राची मोठ्या प्रमाणात निर्यातही करत आहे. भारताची शस्त्रास्त्र निर्यात ३४ पटीने वाढून २३,६२२ कोटींवर पोहचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीचे हे फळ असल्याचेही दरेकर म्हणाले. तसेच युद्ध, नैसर्गिक आपत्ती अशा संकटात सापडलेल्या विदेशातील भारतीय नागरिकांना मोदी सरकारने सुखरुप मायदेशी आणले आहे.

मोदी सरकार हे केवळ देशातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध नसून जगभरातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे, हे यातून दिसल्याचेही दरेकर म्हणाले.

जगातील चौथ्या क्रमांकाची
अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल

दरेकर म्हणाले की, भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत आहे. जगात होणा-या एकूण डिजटल व्यवहारांपैकी ४९ टक्के व्यवहार भारतात होतात. भारताची वस्तू आणि सेवा निर्यात ८२५ अब्ज डॉलर पर्यंत पोहचली आहे. देशात होणा-या युपीआय व्यवहारांनी २४ लाख कोटीची मर्यादा गाठली आहे. देशात ११६ कोटी मोबाईल वापरकर्ते आहेत. देशातील इंटरनेट वापरणा-यांची संख्या गेल्या १० वर्षात २५.५ कोटी वरून २०२४ मध्ये ९७ कोटीपर्यंत पोहचली आहे.

जीइएम पोर्टलद्वारे खरेदी होत असल्यामुळे सरकार खरेदतील भ्रष्टाचार पूर्णपणे संपला आहे. या सरकार प्रणालीद्वारे मार्च २०२५ पर्यंत १३.४१ लाख कोटी रकमेच्या ऑर्डर देण्यात आल्या आहे. मोद सरकारने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सरकार कामकाजात पारदर्शकता आणली आहे. कोविन, युपीआय, आभा, डीजी लॉकर यासारखे डिजटल प्लॅटफॉर्म कायमतेचे प्रतीक ठरले आहेत. मोदी सरकारने सरकारी योजनांचे लाभ डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात पोहचवले आहेत.

गेल्या ११ वर्षात देशातील जवळपास २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि युएनडीपीसारख्या जागतिक संस्थानीही गरिबी निर्मूलनासाठी भारताने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.

मध्यमवर्गीयांचे जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न

दरेकर पुढे म्हणाले की, मध्यमवर्गीयांचे जीवन सुखकर बनविण्यासाठी मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले आहेत. यामुळेच १२.७५ लाखाचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला. २०२४ मध्ये चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली. आता भारत गगन यान मोहिमेच्या तयारीला लागला आहे. अंतरीक्षातही भारत नवनव्या मोहिमा यशस्वी करत आहे.

संशोधक, वैज्ञानिकांना मोकळीक देऊन सरकारकडून सर्व प्रकारचे सहाय्य केले जात असल्यामुळे अंतराळातील मोहिमा यशस्वी होत आहेत. रस्ते, पूल, बोगदे, विमानतळ, हवाई मार्ग, रेल्वे, बंदरे यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी केली आहे. जगातील सर्वात मोठ्या उंचीच्या चिनाब नदीवरील पुलाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतचे झाले. तामिळनाडूतील रामेश्वरम येथे देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री पूल तयार करण्यात आला आहे.

१११ जलमार्गाना राज्य जलमार्ग घोषित करण्यात आले आहे. गेल्या ५ वर्षात ३६०० कि.मी. एवढ्या लांबीचे हायस्पीड कॉरीडॉर तयार करण्यात आले आहेत. रेल्वेसाठीची अर्थसंकल्पातील तरतुद ९ पटीने वाढवण्यात आली आहे. देशात १३६ ‘वंदे भारत’ रेल्वे सुरु झाल्या आहेत. १०३ रेल्वे स्थानकांचे पुननिर्माण केले जात आहे. उडान योजने अंतर्गत देशातील विमानतळांची संख्या दुपटीने वाढून ती १६० वर पोचली आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा विमान प्रवास शक्य झाला आहे.

गरीब कल्याण अन्न योजनेत ८१ कोटी लोकांना दरमहा ५ किलो अन्नधान्य मोफत दिले जाते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ११ कोटीहून अधिक शेतक-यांना ३.७ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. आवास योजनेअंतर्गत ४ कोटींहूनही अधिक घरे बांधली गेली आहेत. १५ कोटींहून अधिक घरांमध्ये नळाद्वारे पाणी दिले जात आहे. १२ कोटीहून अधिक शौचालये बांधली गेली आहेत.

पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यावरही

भारताची लक्षणीय कामगिरी

दरेकर म्हणाले कि, पर्यावरण रक्षणाच्या मुद्यातही भारताने गेल्या ११ वर्षात लक्षणीय कामगिरी केली आहे. ‘एक पेड, माँ के नाम’ अभियानात संपूर्ण देशात १४२ कोटीहून अधिक वृक्षारोपण झाले आहे. देशातील वाघांची संख्या वाढविण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. विकास भी विरासत भी या सूत्रानुसार मोद सरकारने काशी विश्वनाथ कॉरीडॉर, महाकाल परीयोजना, राम मंदिर मंदिर निर्मिती केली आहे. डॉ.आंबेडकरांशी संबंधीत ५ ठिकाणांचा पंचतीर्थ म्हणून विकास केला गेला आहे.

नारीशक्ती अभियानाद्वारे महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. तिहेरी तलाकची अमानुष प्रथा संपुष्टात आणून मुस्लिम महिलांना मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेअंतर्गत ३.९८ कोटी गर्भवती महिलांना १८,५९३ कोटी रुपये एवढे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. बाळंतपणाची रजा २६ आठवडे करण्यात आली आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *