बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याचा बनाव झाला उघड
दौड, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दौंडमधील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिला लता बबन धावडे यांचा बिबट्याच्या हल्लात मृत्यू झाल्याची अफवा उठवण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसून उपसरपंच असलेल्या महिलेच्या पुतण्यानेच तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात अखेर निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सतिलाल वाल्मीक मोरे (वय – ३०, मुळ रा. तिकी, ता चाळीसगाव, जि धुळे. सध्या रा. कडेठाण ता. दौड जि. पुणे आणि अनिल पोपट धावडे (वय – ४० रा. कडेठाण ता. दौड जि. पुणे) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
दौंड तालुक्यातील वरवंड आणि कडेठाण गावच्या शिवेवर असलेल्या कडेठाण हद्दीत ७ डिसेंबर २०२४ रोजी शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे (वय ५० ,रा. कडेठाण) यांच्यावर बिबट्याने हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात फरफडत नेलं. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असे भासवण्यात आले होते. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच महिलेचा मृतदेह घटनास्थळावरून हलवण्यात आला होता. महिलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पुणे येथील ससून रुग्णालयात करण्यात आलं. या रिपोर्टमध्येही गंभीर मार लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने घेतलं नाही. सुरुवातीलाच या संदर्भात शंका उपस्थित करण्यात आली होती. कारण वन विभागांने देखील हा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला नसल्याची शंका उपस्थित केली होती.वन विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत करण्यात आल्या शवविच्छेदनात महिलेचं तोंड आणि डोकं दगडाने ठेचून तिला जिवे मारल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
SL/ML/SL
4 March 2025