नाहीतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले असते

मुंबई, दि 13-
‘मोदींचे कालचे भाषण हे एक नंबरचे बकवास भाषण आहे. हे विजेत्या राष्ट्राच्या प्रमुखाचे भाषण नव्हते. आमचे सैन्य, हवाई दल, नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीत असताना तुम्ही सैन्यांचा अवसान घात केला आणि त्यांना थांबवले. नाहीतर पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले असते,’ असे म्हणत ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर ठाकरे शिवसेनेचे खासदार राऊत यांनी बोचरी टीका करत म्हटले की, काल माझ्या लक्षात आले की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे ईडी आणि सीबीआयच्या मदतीने फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात. पक्ष तोडणे, पक्ष विकत घेणे इतकीच यांची लायकी आहे. पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही. हिंमत असती तर पुढील दोन दिवसात पाकिस्तान तुटला असता. तशी सैनिकांची तयारी होती. असेही राऊत म्हणाले.
भाजपाला डिवचत राऊत पुढे म्हणाले की, आता मला कळले की, हे लोक तिरंगा यात्रा काढत आहेत. भारताच्या तिरंग्याला हात लावण्याची यांची लायकी नाही. वीर सावरकरांचे स्वप्न साकार करण्याची यांना संधी होती. मात्र, या लोकांनी गौतम अदानी आणि अंबानी यांच्यासाठी व्यापार केला आहे. त्यांच्यासमोर व्यापार मोठा आहे, देश मोठा नाही. असा आरोप त्यांनी केला आहे. भविष्यात सगळे सौदे बाहेर येतील, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदीं यांच्या कालच्या भाषणावर केला.