औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद ,बजरंग दलाची निदर्शने

मुंबई दि.17(एम एमसी न्यूज नेटवर्क):छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज आझाद मैदानात जोरदार निदर्शने केली.यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री श्रीराज नायर म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री आणि इतर संबंधित अधिकारी यांना देखील निवेदन देऊन औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी मागणी करण्यात येईल. जर या मागण्यांनंतरही कबर हटविण्यात आली नाही, तर अयोध्येतील कार सेवकांप्रमाणेच तेही आंदोलन करून औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी ठोस पावले उचलतील.
औरंगजेबाच्या कृत्यांवर टीका करताना श्रीराज नायर म्हणाले की,औरंगजेबाने महाराष्ट्रात आक्रमण करून स्त्रियांची अब्रू लुटली आणि देशाला ही लुटले. औरंगजेबाने देशासाठी किंवा राज्यासाठी काहीही सकारात्मक केलेले नाही, त्यामुळे त्याची कबर संतांच्या भूमीत ठेवण्याची काहीही गरज नाही.
औरंगजेबाच्या कबरीच्या बाबतीत मुस्लिम समुदायाला दया दाखवण्याची काहीही गरज नाही, कारण त्याच्या कृत्यांमुळे देशाला फक्त नुकसानच झाले आहे.असे श्रीराज नायर यांनी स्पष्ट केले.