हवामान खात्याकडून उद्या 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणे, दि. 16 : गेल्या आठवडाभरापासून उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातील नागरिक हवालदिल झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशाच्या पार गेला आहे. उष्णतेच्या झळांपासून लोकांना सावध करण्यासाठी IMD कडून वेळोवेळी माहिती देण्यात येत आहे. आज IMD च्या सुचनेनुसार खबरदारीचा उपाय म्हणून वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. तर IMD ने उद्यासाठी (दि. 17 ) राज्यातील 23 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच नागरिकांनी दुपारी 1 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्येही उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे. उष्णतेचा यलो अलर्ट हवामान खात्यानं इथं दिला आहे. येथे कमाल तापमान 35 ते 39 अंश, तर किमान तापमान 22 ते 25 अंश दरम्यान राहील. काही ठिकाणी हलका ढगाळपणा जाणवू शकतो. पुण्यातही उष्ण हवामान पाहायला राहील.
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात हवामान उष्ण आणि दमट राहणार असून कमाल तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 ते 27 अंश दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र राहणार आहे. येथे कमाल तापमान 38 ते 42 अंश, तर किमान तापमान 23 ते 27 अंश राहण्याची शक्यता असून उष्णतेची लाटसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढणार आहे. येथे कमाल तापमान 38 ते 41 अंश, तर किमान तापमान 22 ते 26 अंश राहण्याची शक्यता असून दुपारच्या वेळी कडक उन्हाचा त्रास अधिक जाणवेल. या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक उष्णता जाणवणार आहे. या भागात कमाल तापमान 40 ते 44 अंश, तर किमान तापमान 24 ते 28 अंश राहण्याचा अंदाज असून नागरिकांनी दुपारी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट असेल.
SL/ML/SL