समृद्धी महामार्गावरून १,२४० कोटींची विक्रमी टोल वसूली
मुंबई, दि. १७ : महानगरी मुंबईला नागपूरशी जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’ने कमाईच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. या जलदगती मार्गाने केवळ प्रवासाचा वेळच वाचवला नाही, तर राज्याच्या तिजोरीतही मोठी भर घातली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या महामार्गावरून तब्बल १.५५ कोटी वाहनांनी प्रवास केला असून, त्यातून १,२४०.०४ कोटी रुपयांचा विक्रमी टोल गोळा झाला आहे. ७०१ किमी लांबीचा हा महामार्ग राज्यातील १० जिल्ह्यांना जोडतो. विदर्भ आणि मराठवाड्याला मुंबईशी थेट जोडल्यामुळे या भागातील औद्योगिक विकासाला मोठी गती मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC)जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, समृद्धी महामार्गाच्या लोकप्रियतेत आणि वापरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षातील १,२४० कोटींची वसुली ही मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ४९९.९१ कोटी रुपयांनी जास्त आहे. महामार्ग पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत असताना, पहिल्यांदाच वार्षिक टोल संकलनाने १००० कोटींचा टप्पा पार केला आहे.
टोलवसुलीची आकडेवारी
२०२२-२३: केवळ ४ महिन्यांत १३.५९ लाख वाहने (१०६.४१ कोटी टोल).
२०२३-२४: ६८.९९ लाख वाहने (५२८.१० कोटी टोल).
२०२४-२५: वाहनांच्या संख्येने १ कोटींचा टप्पा ओलांडला (७४० कोटी टोल).
२०२५-२६: १.५५ कोटी वाहने (१,२४०.०४ कोटी टोल).
SL/ML/SL