विदर्भात साकारणार तिसरी चित्रनगरी
मुंबई, दि. ६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा 2026–27 चा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये नागपूर आणि परिसराच्या विकासाबरोबरच मनोरंजन क्षेत्रासाठीही मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रनगरी विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याबरोबरच महाकवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नव्या पिढीला कालिदासांचे साहित्य आणि त्यांचे कार्य समजावे या उद्देशाने हा चित्रपट तयार केला जाणार आहे.
रामटेक तालुक्यातील नवरगाव परिसरात चित्रनगरी उभारण्याचा प्रस्ताव आहे. 60 एकर जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.. चित्रनगरी उभी राहिल्यास विदर्भात चित्रपट, वेब सिरीज आणि मालिकांच्या चित्रीकरणाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.