पालिका अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे कामे रखडली
मुंबई, दि. ५ – पालिका अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे भांडुप विभागातील अनेक शौचालयांची कामे रखडली असून अधिका-यांचा कंत्राटदारांवर कुठल्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे कंत्राटदारांचा मनमानी कारभार चालू असून त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. अशा बेजबाबदार अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व सर्व शौचालयाची कामे त्वरीत सुरु करावी अशी मागणी भांडुप विभागातील सर्व नगरसेवकांनी केली आहे. पालिका उपायुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवकांनी पालिका अधिका-यांना खडसावले.

भांडुप परिसरातील वस्ती स्वच्छता कार्यक्रमा अंतर्गत येणारी शौचालये व पालिकेकडे असलेल्या शौचालयांची कामे रखडली असून पालिका अधिका-यांच्या दुर्लक्षित पणामुळे सर्व कामे अपुर्ण अवस्थेत आहेत. या संदर्भात पालिकेच्या परिमंडळ ६ चे उपायुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली एस वार्ड येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व पक्षीय नगरसेवक, पालिका तसेच वस्ती स्वच्छता कार्यक्रमाचे अधिकारी व कंत्राटदार या बैठकीला उपस्थित होते. पालिका अधिका-यांच्या बेजबाबदार पणामुळे कंत्राटदारांवर त्यांचे नियंत्रण राहिले नसून त्यांच्या मनमानी कारभारामुळे भांडुप परिसरातील शौचालयांची कामे ब-याच कालावधीपासून अपुर्ण अवस्थेत राहिले आहेत. याला पालिका अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच रखडलेली शौचालयांची कामे त्वरीत सुरु करण्यात यावी, अशी मागणी प्रभाग क्र.११४ शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी केली. तसेच भांडुप विभागातील नविन कामे जुन्या कंत्राटदारांना न देता नव्याने कंत्राटदारांची नियुक्ती करुन काम करुन घ्यावीत. अशी मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली. यावेळी पालिका अधिकारी व कंत्राटदारांवर सर्व नगरसेवकांनी संताप व्यक्त करुन कामचुकार करणा-या अधिका-यांना धारेवर धरले. अधिका-यांचा कंत्राटदारांवर वचक राहिला नसल्याने शौचालयांची कामे वर्षानुवर्षे रखडली आहेत. अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे हे होत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. या बैठकीत इतर कामांबाबत आढावा घेण्यात आला.ML/ML/MS