कोकणातील पश्चिम घाट बाधित ३८८ गावे वगळण्याचा प्रस्ताव
नागपूर, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकणातील अनेक गावांना पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्राने बंधनं आल्यामुळे त्याचे सूक्ष्म सर्वेक्षण करण्यात आलं आहे, त्यातील एकूण ३८८ गावे वगळण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल अशी ग्वाही वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.
भास्कर जाधव यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती, या संवेदनशील क्षेत्राने बाधित गावांचे रोजगार ठप्प झाले आहेत, पारंपरिक उद्योग बंद होत असल्याची माहिती जाधव यांनी यावेळी दिली.
२०१८ साली ३८८ गावे वगळण्याचा प्रस्ताव तयार केला होता मात्र २०२१ साली उध्दव ठाकरे यांच्या सरकारने ती संख्या २२ वर आणली होती, ती पुन्हा ३८८ केली जाईल त्यात ९८ गावे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत असंही मुनगंटीवार यांनी सांगितले.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या घटनांमुळे स्थानिक वाघ काही प्रमाणात इतर ठिकाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या सोबत संबधित गावांमध्ये दहा लाख रुपये देऊन स्वरोजगार उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली , विनोद अग्रवाल यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती.
माकडे, हत्ती , वाघ आदी प्राणी शेतीचे नुकसान करत आहेत असं अनेक सदस्यांनी सांगितलं , हत्ती पकडुन ते मूळ राज्यात पाठवण्याची व्यवस्था केली जाते आहे, डोंगर आणि खनिज विकास निधीच्या धर्तीवर अशा वन्य प्राणी ग्रस्त गावांच्या विकासासाठी वन ग्रामविकास निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
ML/KA/SL
29 Dec. 2022