बदलापूरातून ८० हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशांत रवाना
बदलापूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेला भाद्रपदातील गणेशोत्सव सोहळा परदेशांत वास्तव्याला असलेले भारतीयही मोठ्या भक्तीभावाने साजरा करतात.परदेशातील ठिकठिकाणची महाराष्ट्र मंडळे यामध्ये उत्साहाने पुढाकार घेतात.यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती परदेशांत पाठवल्या जातात. परदेशांमध्ये सण उत्सव साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेतली जाते. हे लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जातात.या वर्षी अजून गणेशोत्सवार तीन महिने बाकी आहेत तरी देखील आत्ताच यासाठी यंदा ८० हजार बाप्पा परदेशी रवाना झाले आहेत. बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात. बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी 6 महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते.
मार्च ते जुलै महिन्याखेरपर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते. ज्यात हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात. दरवर्षी अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेश जनवाड हे गणेशमूर्ती पाठवत असतात. त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात. यंदा निमेश जनवाड यांच्या माध्यमातून 80 हजार बाप्पा परदेशवारीला रवाना झाले आहेत.
SL/ML/SL
9 June 2024