शहरातील पायाभूत सुविधा, नागरी समस्यांबाबत शिवसेना नगरसेवकांची पालिका आयुक्तांशी चर्चा
उल्हासनगर, दि १३: उल्हासनगर शहरातील पायाभूत सुविधा,नागरी समस्यांवर तातडीने उपयोजना आणि विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने शिवसेना नगरसेवकांनी पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन शहरातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.
उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने शिवसेना नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांची भेट घेतली.उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्था, प्रलंबित विकासकामे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळातील नगरसेवकांनी त्यांच्या-त्यांच्या प्रभागातील समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षा आयुक्तांसमोर मांडल्या. त्यावर आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देऊन समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान शिवसेना महानगरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख व ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), नगरसेवक जमनु पुरस्वानी, महेश सुखरामानी आणि प्रकाश माखीजा उपस्थित होते. उल्हासनगरकरांच्या हितासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्नशील असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर लवकरच ठोस तोडगा काढला जाईल, असा विश्वास जेष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर यांनी यावेळी व्यक्त केला.KK/ML/MS