देशातील अनेक राज्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद, हॉटेल व्यवसाय संकटात
नवी दिल्ली, दि. १० : इराणच्या हॉर्मुझ जलमार्गातून होणारा गॅस पुरवठा ठप्प झाल्यानंतर भारत सरकारने आता देशभरात ‘अत्यावश्यक वस्तू कायदा 1955’ लागू केला आहे. हे पाऊल उचलले आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांनी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर सध्या बंदी घातली आहे.
या बंदीमुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद होण्याची वेळ आली आहे. लहान हॉटेल्स आणि भोजनालये चालवणाऱ्यांनी सरकारला पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. गॅसअभावी मुंबईतील जवळपास २० टक्के हॉटेल्स आधीच बंद झाली आहेत.
मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्सची संघटना असलेल्या ‘आहार’ (AHAR) कडून मिळालेल्या माहितीनुसार, गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील तीन दिवसांत मुंबईतील ५० टक्के हॉटेल्सना टाळे लावावे लागू शकते. हॉटेल व्यवसाय प्रामुख्याने कमर्शियल गॅसवर अवलंबून असल्याने, हा तुटवडा थेट उत्पादनावर परिणाम करत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संघटना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या संपर्कात असून, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेतली जाणार आहे. बंगळुरू हॉटेल असोसिएशनने गॅस अभावी मंगळवारपासून काही हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर मिळणं पूर्णपणे बंद झालंय. शहरातल्या एकाही गॅस केंद्रावर व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नाही. ज्या व्यावसायिकांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सिलिंडर घेऊन ठेवले होते, त्यांची सोय होऊ शकते. मात्र सध्या नव्या सिलिंडरची मागणी पूर्ण होणार नाही. या सगळ्यामुळे पुण्यातल्या हॉटेल व्यवसायिकांचे दोन दिवसांपासून मोठं नुकसान होतंय. मोठमोठ्या ऑर्डर रद्द करण्याची वेळ आली आहे. हॉटेलमधले मेन्यू कमी होतील. येत्या दोन दिवसांत ८५ टक्के हॉटेल बंद होण्याची भीती आहे.
महाराष्ट्रातील अवजड उद्योगांनाही इंधन टंचाईचा झटका बसला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ५ मोठ्या कंपन्यांचे उत्पादन गॅसअभावी पूर्णपणे ठप्प झाले आहे.