इराण – अमेरिका युद्धविरामामुळे तेलाच्या किंमतीत घसरण
मुंबई, दि. ८ : इराण-अमेरिका युद्धविरामामुळे जागतिक बाजारात दिलासा मिळाला असून कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या खाली घसरल्या आहेत. याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होण्याची शक्यता असून महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. इराण-अमेरिका युद्धाला कालपासून दोन आठवड्यांचा विराम मिळाल्याने मध्यपूर्वेतील तणाव तात्पुरता कमी झाला आहे. गेल्या चाळीस दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ हॉरमुज बंद झाला होता, ज्यामुळे जागतिक तेलपुरवठा विस्कळीत झाला आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये प्रचंड चढ-उतार दिसून आले. पाकिस्तानच्या मध्यस्थीने साध्य झालेल्या या तहामुळे दोन्ही बाजूंनी हल्ले थांबवण्याचे मान्य केले असून, स्ट्रेट ऑफ हॉरमुज पुन्हा खुला करण्यात आला आहे.
न्यूयॉर्क पोस्ट आणि रॉयटर्ससारख्या प्रमुख वृत्तसंस्थांच्या मते, या निर्णयाचा कच्च्या तेलाच्या बाजारावर सर्वात मोठा आणि सकारात्मक परिणाम झाला आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी होत असल्याची बातमी पसरताच, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती 13% ते 17% नी घसरल्या. सर्वसामान्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण बातमी आहे, कारण तेलाच्या किमती आपल्या दैनंदिन जीवनाशी आणि घरगुती खर्चाशी थेट निगडित आहेत.
द संडे गार्डियनच्या रिपोर्टनुसार, कच्चे तेल स्वस्त झाल्यामुळे रिफायनरीच्या दरात घट झाली आहे. कच्चा तेलाच्या दर आधीच 13 टक्के ते 15 टक्क्यापर्यंत घसरले आहेत. यामुळे अशी आशा केली आहे की, पुढील 7 ते 10 दिवसांत याचा परिणाम भारतावरही दिसणार आहे. भारतातील दर एका रात्रीत बदलणार नाही. स्थानिक तेल कंपन्या मागील तोटा आणि कर रचनेचाही विचार करत असल्यामुळे, जर आंतरराष्ट्रीय किमती कमी राहिल्या, तर सरकार आणि तेल कंपन्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकतात. याचा परिणाम केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरच नाही, तर कालांतराने सीएनजीच्या किमतींवरही होईल.
या युद्धविरामामुळे जागतिक बाजारपेठेत दिलासा मिळाला आहे. ब्रेंट क्रूडचे दर 115 डॉलरवरून 98 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले आहेत. अमेरिकन, युरोपियन आणि आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास परत वाढला असून, सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोनं व ट्रेझरी बाँड्समध्ये मागणी कायम आहे.
भारतासाठी हा दिलासा महत्त्वाचा आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने पेट्रोल-डिझेल दर कमी होण्याची शक्यता आहे. वाहतूक व उत्पादन खर्च घटल्याने महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. रुपयावरचा दबाव कमी होईल आणि ऑटोमोबाईल, एव्हिएशन व लॉजिस्टिक्स क्षेत्राला फायदा होईल. भारतीय शेअर बाजारातही तेजीची चिन्हे दिसत आहेत.
तथापि, हा तह तात्पुरता असल्याने दीर्घकालीन स्थिरता अजूनही अनिश्चित आहे. इस्रायल-लेबनॉन सीमेवर अजूनही हल्ल्यांची छिटपुट बातमी येत आहे. अमेरिका-इराण चर्चेत विश्वासाचा अभाव कायम असल्याने पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. भारताने या संधीचा उपयोग करून रणनीतिक तेल साठा वाढवणे आणि दीर्घकालीन ऊर्जा धोरणावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
इराण -अमेरिका युद्ध विरामाची कारणे
इराण-अमेरिका युद्धाला दोन आठवड्यांचा विराम का झाला यामागे काही महत्त्वाचे राजकीय आणि आर्थिक कारणे आहेत.
प्रथम, मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक तेलपुरवठा विस्कळीत झाला होता. स्ट्रेट ऑफ हॉरमुज बंद झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आणि जगभरातील अर्थव्यवस्थांवर दबाव आला. अमेरिका आणि युरोपियन देशांवर महागाईचा ताण वाढत होता. त्यामुळे जागतिक बाजार स्थिर ठेवण्यासाठी युद्धविरामाची गरज निर्माण झाली.
दुसरे म्हणजे, पाकिस्तानने मध्यस्थीची भूमिका निभावली. इस्लामाबादमध्ये झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंनी तात्पुरता तह मान्य केला. पाकिस्तानने इराणला स्ट्रेट ऑफ हॉरमुज पुन्हा खुला करण्यास पटवले, तर अमेरिकेने हवाई हल्ले थांबवण्याचे आश्वासन दिले.
तिसरे कारण म्हणजे, मानवी हानी आणि प्रादेशिक अस्थिरता. गेल्या चाळीस दिवसांत हजारो लोकांचा जीव गेला, शेकडो जहाजे अडकली आणि गल्फ देशांवर हल्ल्यांची भीती निर्माण झाली. या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आणि युद्धविराम अपरिहार्य ठरला.
SL/ML/SL