महाबोधी महाविहार मुक्तीसाठी १० मार्चला पुण्यात राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन
पुणे, दि ६: गया (बिहार) येथील ऐतिहासिक ‘महाबोधी महाविहाराचे’ व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी पुणे परिसरातील भिक्खू संघातर्फे राष्ट्रव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर), पुणे येथे पार पडणार आहे. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला या आंदोलनाचे समन्वयक भंते नागघोष महाथेरो, भंते धम्मानंद, भंते पंय्यारखित, भंते संचितबोधी, भंते मिलिंद उपस्थित होते.
आंदोलनाची पार्श्वभूमी आणि मुख्य मागण्या:
ऐतिहासिक वारसा: तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले, त्या गया येथील महाबोधी महाविहाराची निर्मिती चक्रवर्ती सम्राट अशोकाने केली होती.
व्यवस्थापनाचा प्रश्न: हजारो वर्षांचा बौद्ध वारसा असूनही, या विहाराचे व्यवस्थापन सध्या बौद्धेतर व्यक्तींच्या (विशेषतः ब्राह्मण धर्मपंडितांच्या) ताब्यात आहे. हे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध अनुयायांच्या देखरेखीखाली असावे, अशी जगभरातील बौद्ध बांधवांची आग्रही मागणी आहे.
एकजुटीचे आवाहन: भगवान बुद्धांचा धम्म आणि वारसा जतन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असे मानून देशभरातील बौद्ध समाज शहर, जिल्हा आणि तालुका स्तरावर संघटित होऊन हे आंदोलन करत आहे.
व्यापक पाठिंबा:
या आंदोलनास सर्व राजकीय पक्ष, राजकीय नेते, बौद्धेतर धर्म प्रतिनिधी आणि विद्वान व्यक्तींचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि व्यापक सहमती निर्माण करण्यासाठी ‘महाबोधी महाविहार धरणे आंदोलन’ आयोजित करण्यात येत आहे.
पुणे परिसरातील सर्व धम्मप्रेमी आणि न्यायप्रिय नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘पुणे परिसरातील भिक्खू संघ’ या निमंत्रक संस्थेमार्फत करण्यात आले आहे.KK/ML/MS