भारतातील सर्वांधिक लांबीचा भूकंपरोधक पूल या राज्यात
नवी दिल्ली, दि. 11 : आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर उत्तर आणि दक्षिण गुवाहाटीला जोडणारा पहिला 6-लेन एक्स्ट्राडोसेड पूल किंवा ‘महासेतू’ तयार झाला आहे. हा भारतातील सर्वात लांब एक्स्ट्राडोसेड पूल असेल. हा पूल भूकंप-प्रतिरोधक तंत्रज्ञानाने डिझाइन केला आहे आणि त्याचे अंदाजित आयुष्य 100 वर्षे आहे. आसामचा हा प्रदेश भूकंप झोन-6 मध्ये येतो, त्यामुळे पुलामध्ये विशेष पेंडुलम प्रणाली बसवण्यात आली आहे, जी भूकंपाचे धक्के सहन करून त्यांना खाली सरकवते.
एक्स्ट्राडोसेड पूल गर्डर आणि केबल या दोन्ही तंत्रज्ञानावर आधारित असतो. यामुळे तो पारंपरिक पुलांपेक्षा अधिक मजबूत आणि किफायतशीरही असतो. पुलाचे बांधकाम सुमारे 99% पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात त्याचे उद्घाटन करतील अशी शक्यता आहे.
देशातील अन्य वैशिष्टपूर्ण पूल
- तमिळनाडूतील रामेश्वरम येथे आशियातील पहिला वर्टिकल लिफ्ट स्पॅन रेल्वे पूल (नवीन पंबन पूल) आहे. 2.08 किमी लांबीच्या या पुलाची पायाभरणी नोव्हेंबर 2019 मध्ये करण्यात आली होती.
- जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिजचे नुकतेच उद्घाटन झाले होते. चिनाब आर्च ब्रिज रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौडी दरम्यान बांधला आहे.
SL/ML/SL