हा तर भ्रष्टाचाराचा एक्सप्रेसवे! स्मार्ट सिटी नको, निदान एक्सप्रेसवे तरी स्मार्ट करा
पुणे दि ९ : मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटून तब्बल ३० तास वाहतूक ठप्प राहिली. या कोंडीमुळे विशेषतः महिला, लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे हाल झाले. धक्कादायक बाब म्हणजे घटनेला पाच दिवस उलटूनही वाहतूक अजून पूर्णपणे सुरळीत झालेली नाही.
या घटनेतून एक्सप्रेसवेवरील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचा पूर्ण अपयश समोर आले असून, अशा प्रसंगी जबाबदारी नेमकी राज्य सरकारची की टोल कंपनीची, हे स्पष्ट व्हायला हवे, अशी ठाम मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.
एक्सप्रेसवेवर नियमित प्रवास करणारे आणि सुमारे वीस वर्षांपूर्वी याच महामार्गावरील एका भीषण अपघातातून चमत्कारिकरित्या बचावलेले गाडगीळ यांनी, प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, एक्सप्रेसवेवरील अंदाधुंदी, निष्काळजीपणा आणि व्यवस्थेच्या कोलमडलेल्या स्थितीवर सडकून टीका केली आहे.
गाडगीळ यांनी उपस्थित केलेले गंभीर मुद्दे :
१) अवजड वाहनांचा बिनधास्त वावर
नियमांनुसार ट्रक व टँकरसारख्या अवजड वाहनांना उजव्या व मधल्या लेनमधून प्रवासास मनाई असतानाही, हीच वाहने सर्रास या लेन अडवून चालतात. परिणामी, वेगात असलेल्या मोटारींचे भीषण अपघात सातत्याने घडत आहेत.
या वाहनांना रोखण्यासाठी एकही वाहतूक पोलीस पुढे येत नसल्याने दररोज वाहतूक कोंडी हेच वास्तव बनले आहे.
२) वेगमर्यादेतील गोंधळ आणि दंडाचा सापळा
एक्सप्रेसवेवर मोटारींसाठी तासाला १०० किमी वेगमर्यादा असताना, घाट विभाग वगळता अनेक ठिकाणी ४०, ६० आणि १०० किमीचे फलक अंतराअंतरावर अनियमितपणे बदलतात.
या विसंगतीमुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो आणि नेमक्या अशाच ठिकाणी पोलीस दंड आकारतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर असल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले.
३) कोंडीच्या ठिकाणी पोलीस गायब, टोल नाक्यांवर गर्दी
शिंग्रोबा देवळाजवळ व लोणावळा फाट्याजवळ १–२ ठिकाणे वगळता, संपूर्ण एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी असतानाही बहुतेक वेळा एकही वाहतूक पोलीस दिसत नाही.
मात्र दोन्ही टोल नाक्यांवर किमान २० वाहतूक पोलीस ‘गिऱ्हाईकांच्या’ शोधात उभे असतात, असा आरोप गाडगीळ यांनी केला. इतकेच नव्हे, तर या टोल नाक्यांवर एकाही पोलीस उपनिरीक्षक वा वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक नसल्याची माहितीही त्यांनी उघड केली.
४) मोबाईल फोटोद्वारे बेकायदेशीर दंड
स्वतःच्या मोबाईलवर घेतलेल्या फोटोच्या आधारे दंड आकारू नये, असे स्पष्ट आदेश असतानाही, एक्सप्रेसवेवर अनेक वाहतूक पोलीस मोबाईलवर फोटो काढून वाहनचालकांना वेठीस धरत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.
यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, दर महिन्याला ठरावीक ‘टार्गेट’ दिले जाते, त्यामुळे दंड केल्याशिवाय पर्याय नसल्याची कबुली काही वाहतूक पोलीस खासगीत देत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
५) पोलीस चौक्या गायब, व्यवस्था कोलमडलेली
काही वर्षांपूर्वी विधानपरिषदेत गाडगीळ यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, तत्कालीन पोलीस महासंचालकांनी घाट विभागात दर २–३ किमीवर लहान पोलीस चौक्या उभारल्या होत्या.
मात्र कालांतराने त्या चौक्यांमधील पोलीसच नव्हे, तर आज त्या चौक्याच पूर्णपणे गायब झाल्या आहेत, हे वास्तव गाडगीळ यांनी उघड केले.
“स्मार्ट सिटीच्या जाहिराती सोडून द्या, पण युती सरकारने निदान किमान एक्सप्रेसवे तरी स्मार्ट करावा,” असा उपरोधक टोमणा लगावत गाडगीळ यांनी सरकारच्या ‘विकासाच्या’ दाव्यांची पोलखोल केली आहे.ML/ML/MS