मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप

 मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप

मुंबई, दि. १३ : गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पोषण आहार देणे शक्य झाले नसल्याने केळी, सफरचंद अशी फळं देण्यात आल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी दिली. मुंबईत केंद्रीय स्वयंपाकगृह चालविणाऱ्या १४७ महिला संस्थांना एलपीजी गॅस पुरवठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पालिकेच्या शाळांतील ५.४० लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाला मुकावे लागले. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे शक्य न झाल्याने केळी, सफरचंद अशी फळे वाटप करण्यात आल्याचे राजश्री शिरवडकर यांनी सांगितले.

दरम्यान मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगर रुग्णालयांत सिलिंडरचा साठा पुरेसा आहे. परंतु उपनगर रुग्णालयांत जेवणाचा पुरवठा कंत्राटदारांच्या माध्यमातून होतो. त्यामुळे सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबाबत गॅस वितरण करणाऱ्या कंपनीला पत्र लिहिल्याचे उपनगर रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी सांगितले.

कूपर रुग्णालयात रोज एक ते दीड हजार रुग्णांचे जेवण ‘इस्कॉन’मधून येते. ‘इस्कॉन’कडे सद्य:स्थितीत सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देवादास शेट्टी यांनी सांगितले. केईएम रुग्णालयात १२ तासांच्या दोन शिफ्टमध्ये ३ हजार रुग्णांचे जेवण तयार करण्यात येते. परंतु, केईएम रुग्णालयात पाईपलाईनने गॅस पुरवठा होत असल्याने रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *