गॅस टंचाईमुळे बेस्टची उपाहारगृहे बंद
मुंबई, दि. ३ : भारताची आर्थिक राजधानी मुंबईलाही आता एलपीजीच्या गॅस तुटवड्यामुळे झळ बसू लागली आहे. गॅस टंचाईमुळे बेस्ट उपक्रमातील उपाहारगृह हळूहळू बंद होत आहेत. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून वेळीच याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी दि बीईएसटी वर्कर्स युनियनने बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे. बेस्टचे जवळपास २५ हजार कर्मचारी दररोज या उपाहारगृहांवर अवलंबून असतात. गॅस टंचाईमुळे उपाहारगृहांनी दररोजच्या आहारातील तसेच नाश्त्यातील मेन्यू मर्यादित केला असून आता मोजकेच पदार्थ कर्मचाऱ्यांना दिले जात आहेत.
बेस्टचे चालक, वाहक आणि कार्यशाळा कर्मचारी तसेच हजारो कर्मचारी अहोरात्र मुंबईची सेवा बजावत असतात. या कर्मचाऱ्यांना सकस आणि वेळेवर आहार मिळण्यासाठी ही उपाहारगृहे हा मुख्य आधार आहेत. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक उपहारगृहे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जर ही उपाहारगृहे बंद झाली, तर कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि पर्यायाने उपक्रमाच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो, शशांक राव यांनी म्हटले आहे.
SL/ML/SL