तिसऱ्या अपत्याला जन्म दिल्यास आंध्र सरकार देणार 85 हजारापर्यंत मदत
अमरावती, दि. ७ : जन्मदर घटत चालल्याची समस्या आता भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये जाणवू लागली आहे. यावर उपाय म्हणून आंध्र प्रदेश सरकारच्या नव्या लोकसंख्या धोरणानुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाच्या जन्मावेळी सरकारकडून 25 हजार रुपये मिळणार आहेत. तसेच तिसऱ्या मुलाचा जन्म झाला तर त्याला सरकारच्या वतीनं अतिरिक्त सुविधा देखील दिल्या जाणार आहेत. सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार तिसऱ्या अपत्याला पहिले पाच वर्ष दर महिन्याला एक हजार रुपये दिले जाणार आहेत, तसेच 18 वर्षांपर्यंत त्याला मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. जर आर्थिक मदत मिळाली तर लोक तिसऱ्या मुलाला जन्म देतील असं येथील सरकारला वाटत आहे. याचाच अर्थ आंध्र प्रदेशमध्ये जर आता तिसरं आपत्य जन्माला घातलं तर एकूण 85 हजारापर्यंतची मदत सरकारकडून मिळणार आहे.
राज्यात जन्मदर सातत्याने कमी होत आहे. जर पुढील काही वर्ष अशीच परिस्थिती राहिली तर राज्यात तरुणांची संख्या कमी होईल, परिणामी क्रयशक्ती कमी होईल. ही समस्या लक्षात घेऊन आता सरकार नवीन लोकसंख्या धोरण आणण्याची तयारी करत आहे. या धोरणांतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्याच्या जन्मानंतर आर्थिक मदतीची योजना सरकार आणणार असल्याचं चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.
SL/ML/SL