ऐरोली प्रवेशद्वार उभारणीस प्राधान्य देवून त्याधर्तीवर इतर तिन्ही प्रकल्पांना वेग देण्यात येईल – महापौर श्रीमती रितू तावडे यांचे निर्देश
मुंबई, दि २५
मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन केंद्राचा विकास हा मुंबईची जागतिक ओळख स्थापन करणारा, मुंबईकरांच्या अस्मितेशी जोडलेला आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महसुलात भर टाकणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करावयाची आहे. पुढील १५ दिवसांत या चारही प्रवेशद्वारांची संकल्पना सादर करावी. या चारपैकी ऐरोली प्रवेशद्वार प्रकल्पाला प्राधान्य देवून त्या धर्तीवर पुढील तीन प्रकल्प देखील राबवले जातील, असे निर्देश मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले आहेत.
मुंबईतील दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी, सुशोभीकरणासह परिसर व पर्यटन केंद्राचा विकास करण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील समिती सभागृह क्रमांक एक येथे आज (दिनांक २५ मार्च २०२६) संयुक्त बैठक संपन्न झाली. त्यावेळी महापौर श्रीमती रितू तावडे या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या.
आर मध्य व आर उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश दरेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, उपआयुक्त (उद्याने) श्री. अजितकुमार आंबी, उपआयुक्त (परिमंडळ ६) श्री. संतोषकुमार धोंडे, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, प्रमुख अभियंता (रस्ते) श्री. मंतय्या स्वामी, नगर अभियंता श्री. रामचंद्र कदम, महानगरपालिका वास्तुशास्त्रज्ञ श्री. उमेश नगरकर, आर उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. नयनीश वेंगुर्लेकर, टी विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती योगिता कोल्हे हे यावेळी उपस्थित होते. तसेच, सिडकोच्या अतिरिक्त मुख्य अभियंता (परिवहन) श्रीमती बिंदू मुरलीधर, परिवहन अभियंता श्री. राहूल गोपनारायण, मीठ आयुक्त विभागाचे अधीक्षक श्री. एस. के. ठाकूर, उपअधीक्षक श्री. जगदीश वाळूंजवाणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभाग अभियंता श्री. एस. सी. हिरे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी, दहिसर, वाशी, ऐरोली आणि मुलुंड येथील प्रवेशद्वारांची उभारणी करण्याच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांकडून प्राथमिक माहिती जाणून घेण्यात आली. प्रवेशद्वार उभारणीसाठी नेमकी जागा, तेथील सध्या प्रगतिपथावर असलेले तसेच भविष्यातील नियोजित प्रकल्प, प्रवेशद्वारांच्या जोडीला परिसर विकास व सुशोभीकरणाची संभाव्यता, हरितक्षेत्र वाढीसाठी करावयाची उपाययोजना, प्रवेशद्वार प्रकल्प अंमलबजावणीसाठी वेगवेगळ्या शासकीय प्राधिकरणांशी समन्वय साधणे, आवश्यकतेनुसार त्यांचे अभिप्राय व नाहरकत प्राप्त करणे, सल्लागारांकडून मदत घेणे इत्यादी पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
चर्चेअंती महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, मुंबई प्रवेशद्वार संकल्पनेला शासनाचेही पूर्ण पाठबळ आहे. चारही प्रवेशद्वारांच्या ठिकाणी मी स्वतः पाहणी पूर्ण केली आहे. आता सर्व संबंधित विभागांनी आपसात समन्वय साधून येत्या पंधरा दिवसात संकल्पना सादर कराव्यात. या प्रकल्पासाठी सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) माध्यमातून निधी उभारण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यासाठी बोलणी सुरु आहे. प्रकल्पाचा आराखडा तयार झाला तर हा निधी आणता येईल. पर्यायाने महानगरपालिकेच्या निधीची बचत होवू शकेल. तसेच प्रवेशद्वार व परिसर विकास प्रकल्प अंमलात आल्यानंतर महानगरपालिकेच्या महसुलात भर पडणार आहे. या प्रकल्पामध्ये पर्यावरण संवर्धनाशी निगडित बाबी देखील समाविष्ट केल्या आहेत. एकूणच, मुंबईच्या हिताचा हा प्रकल्प पूर्ण संवेदनशिलता राखून, कालबद्ध पद्धतीने पूर्णत्वास न्यायचा आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य व योग्य कार्यवाही करावी, असे महापौरांनी अखेरीस नमूद केले.KK/ML/MS