आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका…
जालना दि १५ : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जालन्यातील टरबुज उत्पादक शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. इराण, इस्राईल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे टरबुजाची परदेशात होणारी निर्यात सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहे. रमजान महिन्यात आखाती देशांमध्ये टरबुजाला मोठी मागणी असते. त्यामुळे यंदा टरबुजाला 20 ते 30 हजार रुपये प्रति टन असा भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात बंद झाल्याने टरबुजाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांना टरबुजाला सुमारे 7 हजार रुपये प्रति टन, म्हणजेच सुमारे 7 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. या कमी दरामुळे टरबुज पिकावर केलेला खर्चही निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे टरबुज उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात ठप्प झाल्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र सध्या जालन्यात पाहायला मिळत आहे.ML/ML/MS