मार्क्सवादी कम्युनिस्टपक्षाच्या वतीने महाड चवदार तळे सत्याग्रह मानवी हक्क परिषद
मुंबई, दि १३
कोकणातील महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार 20 मार्च रोजी होणार आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत, महाड चवदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्व आहे.याच सत्याग्रह आंदोलनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला.
या १९२७ सालच्या ऐतिहासिक सत्याग्रह परिषदेचे प्रमुख संघटक,महाड जवळील दासगाव चे शिक्षित लढाऊ तरुण रामचंद्र बाबाजी मोरे उर्फ आर बी मोरे हे होते. जे त्याकाळातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी व पत्रकारही होते.नंतर ते कम्युनिस्ट पक्षाचे धडाडीचे नेते व पत्रकार बनले.
अशा या आर.बी मोरे यांच्याच महाड जवळील लाडवली या जन्म गावातील,बेटकर मठातील सभागृहात दि.१९ मार्च रोजी ” मानवी हक्क राष्ट्रीय परिषद,” मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्या तर्फे व जाती अंत संघर्ष समिती , महाराष्ट्र समितीच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार आहे.
या परिषतेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉ.एम.ए.बेबी, पॉलिट ब्युरो सदस्य डॉ अशोक ढवळे, आंबेडकरी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे,महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी,लोक शाहीर संभाजी भगत, मा.क.प चे राज्य सचिव व शेतकरी नेते कॉ अजित नवले, महाराष्ट्रातील सामाजिक विचारवंत आदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सुमारे एक हजार प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
परिषदेचे उद्घाटन सत्र दुपारी २ वाजता सुरू होईल.त्यामधे वरील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेत महाड चवदार तळे सत्याग्रहाचे प्रमुख संघटक कॉम्रेड आर बी मोरे यांनी लिहिलेल्या ” महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह ” या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तका चा कॉ.एम ए. बेबी यांच्या हस्ते प्रकाशित होईल.
या परिषदेत,आजचे जात वास्तव व भारतीय संविधान समोरील आव्हाने ” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे,ज्यात प्रमुख कार्यकर्ते सहभागी होतील.तसेच शताब्दी निमित्ताने वर्षभर जे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत,त्याची घोषणा करण्यात येईल.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दि.२० मार्च रोजी सकाळी ९ वाजता परिषद स्थळापासून कार्यकर्त्यांची भव्य मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,महाड चवदार तळे व ऐतिहासिक क्रांतीभुमी वर डॉ बाबासाहेब आंबेडकर व सत्याग्रहीना अभिवादन करण्यात येईल.
अशी माहिती रायगड जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉ रामचंद्र म्हात्रे, सीटू चे नेते कॉ.भुषण पाटील, किसान सभेचे नेते कॉ.संतोष ठाकूर,जाती अंत संघर्ष समिती चे राज्य निमंत्रक कॉ शैलेंद्र कांबळे व कॉ सुबोध मोरे यांनी दिली आहे.KK/ML/MS