रोजगार द्या नाहीतर जेलमध्ये टाका” — ५ मार्च रोजी मुंबईत २५ हजार युवकांचे जेलभरो आंदोलन-बालाजी पाटील चाकूरकर

 रोजगार द्या नाहीतर जेलमध्ये टाका” — ५ मार्च रोजी मुंबईत २५ हजार युवकांचे जेलभरो आंदोलन-बालाजी पाटील चाकूरकर

मुंबई, दि ४
राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षित झालेल्या युवकांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या मागणीसाठी दिनांक ५ मार्च २०२६ (गुरुवार) रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर २५ हजार युवक-युवतींचे भव्य जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ सहाय्यक संघटनेचे नेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
संघटनेचे नेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी याबाबत इशारा देत सांगितले की, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून दहा लाख युवकांना रोजगार देण्याचे तसेच त्यापैकी ५० टक्के म्हणजे पाच लाख युवकांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन राज्यातील तत्कालीन व विद्यमान नेतृत्वाने दिले होते.
मात्र, एक वर्ष उलटूनही राज्य सरकारने या संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. विविध १९ आंदोलने करूनही सरकारने केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही कृती केली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
यासंदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान काढण्यात आलेल्या लोटांगण मोर्चावर लाठीचार्ज झाल्याची घटनाही त्यांनी नमूद केली. अनेक प्रशिक्षणार्थी जखमी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.
दरम्यान, आझाद मैदानावर ५ जानेवारी २०२६ पासून बेमुदत आंदोलन सुरू असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनात २४ फेब्रुवारी रोजी माजी मंत्री तथा आमदार भास्करराव जाधव यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. २६ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर देताना केलेल्या वक्तव्याचा संघटनेने निषेध केला आहे. संबंधित वक्तव्याचे व्हिडिओ मुंबई येथील मराठी पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आल्याची माहिती संघटनेचे नेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी दिली.
संघटनेची मागणी स्पष्ट करताना बालाजी पाटील चाकूरकर म्हणाले, “एक तर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या, अन्यथा आम्हाला जेलमध्ये टाका.” महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून सुमारे २५ हजार प्रशिक्षणार्थी आझाद मैदानावर एकत्र येऊन सायंकाळी जेलभरो आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कौशल्य विकास मंत्र्यांच्या वक्तव्यांचे व्हिडिओ सादर करण्यात आले. संबंधित मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
सरकारने बेरोजगार युवकांवरील अन्याय तात्काळ दूर करून कायमस्वरूपी रोजगाराबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा बालाजी चाकूरकर यांनी दिला.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *