बारामतीत ‘किसान सन्मान’ कार्यक्रम; स्टिहल इंडियाकडून देशव्यापी ‘परिवर्तन यात्रा’चा शुभारंभ
बारामती, दि ४: भारतीय शेतीला तांत्रिक बळकटी देत यांत्रिकीकरणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने स्टिहल इंडिया तर्फे कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), बारामती येथे ‘किसान सन्मान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत शेतीत मोलाचे योगदान देणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास परिंद प्रभू देसाई (व्यवस्थापकीय संचालक, स्टिहल इंडिया), शोभित बहेल (विपणन संचालक), प्रद्युम्न चतुर्वेदी (व्यापार विपणन व्यवस्थापक) तसेच राजेंद्र पवार (अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट) आणि केव्हीके बारामतीचे वरिष्ठ अधिकारी व कृषी वैज्ञानिक उपस्थित होते. शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमादरम्यान श्री. देसाई यांनी वाढती अन्नधान्याची मागणी, मजूरांची कमतरता आणि कार्यक्षमतेची गरज लक्षात घेता यांत्रिकीकरण ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. अत्याधुनिक आणि सुरक्षित यंत्रसामग्रीद्वारे शेतकऱ्यांची उत्पादकता व नफा वाढविण्यासाठी स्टिहल इंडिया कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
‘किसान सन्मान’ उपक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. सन्मानित शेतकऱ्यांनी त्यांच्या यशोगाथा मांडत इतरांना आधुनिक शेती तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले.
याच वेळी स्टिहल इंडियाने देशव्यापी ‘परिवर्तन यात्रा’चा शुभारंभ केला. ही यात्रा देशातील १०० कृषी विज्ञान केंद्रांशी जोडली जाणार असून विविध ठिकाणी थेट प्रात्यक्षिके, तांत्रिक मार्गदर्शन, सुरक्षित आणि कार्यक्षम यंत्र वापराबाबत शिक्षण तसेच शेतीतील यांत्रिकीकरणाचा व्यापक प्रसार केला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी स्टिहल इंडिया टोल फ्री क्रमांक ९०२८४११२२२ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमातून भारतीय शेती अधिक उत्पादक, शाश्वत आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने कंपनीची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे.KK/ML/MS