वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी पाकच्या ५ मोठ्या मागण्या
मुंबई, दि. ९ : भारताला सर्वत्र पाण्यात पाहणाऱ्या पाकीस्ताने यावर्षी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही राजकारण आणत भारताविरुद्ध खेळण्याचे नाकारत स्पर्धेवर बहिष्कार घातला आहे. ICC ने पाक संघाला वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्यासाठी अखेरची संधी दिली असतानाही पाकने पाच मागण्या केल्या आहेत. भारत-पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारी रोजी नियोजित आहे. दरम्यान रविवारी झालेल्या बैठकीत टी-20 विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवरुन पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर अनेक मागण्या मांडल्या आहेत. आयसीसीने त्यापैकी तीन मागण्या फेटाळून लावल्या आहेत, ज्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्याचा आणि बांगलादेश, पाकिस्तान व भारत यांचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेचा प्रस्तावांचा समावेश होता.
आयसीसीने पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी सल्लामसलत करून बोर्डाची भूमिका निश्चित करण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली आहे. पाकिस्तान बोर्ड भारत-पाकिस्तान सामन्याच्या स्थितीबद्दल सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
रविवारी पाच तासांहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीला पाकिस्तानचे गृहमंत्री असलेले मोहसिन नक्वी आणि आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा उपस्थित होते. विशेष म्हणजे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपले सामने खेळण्यासाठी भारतात जाण्यास नकार दिल्यानंतर, टी-20 विश्वचषकातून बांगलादेशला वगळण्याच्या विरोधात मतदान करणारा पाकिस्तान हा एकमेव सदस्य देश ठरला होता. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल हेदेखील चर्चेत सहभागी होण्यासाठी लाहोरला गेले होते.
पाकिस्तान सरकारने 1 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये आपल्या वरिष्ठ राष्ट्रीय संघाला टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध खेळण्याची परवानगी नाकारली. तथापि, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नंतर स्पष्ट केलं की, हा निर्णय बांगलादेशला पाठिंबा दर्शवण्यासाठी घेण्यात आला होता आणि त्यांनी आयसीसीवर पक्षपाताचा आरोप केला.
SL/ML/SL